March 7, 2016
आरती जाधव
‘स्किझोफ्रेनिया’ हा मानसिक आजार
असला तरी तो मेंदूचाच एक विकार आहे. या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्ती
एकलकोंडय़ा असतात. समाजातील वास्तविक घटनांशी असलेली नाळ तुटलेली असते. अशा
स्थितीत हे लोक भ्रामक व आभासी जगात जगू लागतात.
बलात्कार, खून, अपहरण, दरोडे व
हत्याकांडासारख्या अनेक घटना सर्वसामान्यांसाठी नित्याच्याच आहेत. समाजात
घडणा-या या घटनांमुळे नागरिकांमधील संवेदनशीलताच हरवत चालली आहे. पण
ठाण्यात एकाच कुटुंबातील १४ जणांचा गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याचे वृत्त
कानी पडल्यानंतर ही घटना नकळत का होईना सर्वसामान्य नागरिकांना विचार
करायला भाग पाडले. कोणतेही कारण नसताना हस्नेल वरेकर या तरुणाने स्वत:च्या
कुटुंबातील सदस्यांची केलेली हत्या ही हृदयाचा ठोका चुकवणारी घटना होती. ती
समोर आल्यानंतर मनावर ताबा न ठेवता क्रूरकृत्य करणा-या या हस्नेलच्या
मानसिकतेसंदर्भात विविध स्तरावर व्यापक चर्चा सुरू झाली.
वाहिन्यांनीही सायंकाळच्या ‘टॉक शो’ मध्ये
हाच मुद्दा लावून धरला. मानसोपचार तज्ज्ञांनीही यावर अभ्यास सुरू केला.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा ‘स्किझोफ्रेनिया’ आजाराने ग्रस्त असल्याचे
म्हटले होते. मानसिक आजाराचे अनेक प्रकार असतात. एखादा मोठा धक्का सहन न
झाल्याने अनेकदा रुग्ण मानसिक दडपणाखाली जातो. यावर वेळीच उपचार झाल्यास
रुग्ण बरा होऊ शकतो. सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच त्यांची वागणूक असल्याने
अनेकदा कुटुंबात एकत्र राहणारी व्यक्ती मानसिक रोगी असल्याचे पटकन कळून येत
नाही. पण तसेच काही घडल्यास या व्यक्ती समोर येतात. त्याचप्रमाणे,
‘स्किझोफ्रेनिया’ची लक्षणे असणारे लोक अत्यंत संशयी प्रवृत्तीचे असतात.
त्या कोणत्याही व्यक्तींवर सहजा विश्वास ठेवू शकत नाही. ही मंडळी माझे
चांगले झालेलं पाहू शकत नाहीत. आपलं वाईट व्हावे यासाठी त्या काहीही करू
शकतात. प्रसंगी आपला घातही करतील, अशी भीती सतत त्यांच्या मनात घर करून
राहिलेली असते. स्वत:ला वाचवण्यासाठी ते हिंसक बनतात.
या आजाराचे रुग्ण लवकर आढळून आल्यावर
त्यावर उपचार करणे सोपे जाते. सर्वसाधारणपणे मनोविकारतज्ज्ञांकडे रुग्ण
पोहोचतात तेव्हा त्यांचा आजार खूप वाढलेला असतो. काही रुग्णांमध्ये हा आजार
भूकंपासारखा अचानक येऊन ठेपतो. पण काही रुग्णांना हा आजार हळूहळू होतो.
नातेवाईकांना व मित्र-मैत्रिणींना काही तरी बिनसले आहे हे कळते, पण नेमके
काय ते कळत नाही. हे बदल पुढे येणा-या मानसिक आजारांची लक्षणे असतील याचा
त्यांना अंदाज नसतो. ही मंडळी कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून चिडचिड करणे,
देवळात कधीही जाणे, उपवास करणे, अचानक खूप पूजा करणे असे काहीतरी विचित्रच
वागतात, असे मानसोपचार तज्ज्ञांकडून सांगण्यात येतेय.
काही दिवसांपूर्वी सादर केलेल्या
फॉरेन्सिक अहवालात हस्नेलने हत्या करण्यापूर्वी कुटुंबीयांना गुंगीचे औषध
दिल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकंच नाहीतर हस्नेल हा मानसिक रोगी होता.
त्यामुळे त्याच्याकडे क्लोझ्ॉपिन नावाचे औषध होते. अनेक वर्षापासून तो या
औषधाचे सेवन करत होता. या औषधांमुळे गुंगी येते. हे पाहूनच हस्नेलने जेवणात
औषध मिसळले होते. हस्नेलकडे असणा-या या औषधावरूनच तो ‘स्किझोफ्रेनिया’
रुग्ण होता यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानंतर स्किझोफ्रेनिया या
आजाराबाबत सर्वसामान्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. कारण, विविध गंभीर आजार
ज्याची कदाचित लोकांनी नावं सुद्धा पहिल्यांदाच ऐकली असतील.
जसे, डेंग्यू, स्वाईन फ्लू, ब्लर्ड फ्लू,
एबोला यांसारखे भन्नाट नाव असलेले जीवघेणे आजार जगभरात पाय रोवू लागले
आहेत. या आजाराबाबत जनतेला कल्पनाच नाही. पण समाजात मोठय़ा प्रमाणात करण्यात
आलेल्या जागरूकतेमुळे या आजाराची व्याप्ती व त्यावर करावयाची
प्रतिबंधात्मक उपाययोजना याची माहिती लोकांना मिळाली. त्याचप्रमाणे
‘स्किझोफ्रेनिया’ या आजारासंदर्भात लोक अज्ञानी आहेत. त्यामुळे या
आजारासंदर्भातही लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली पाहिजे. जेणेकरून
आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात किंवा शेजारी अशा व्यक्ती नजरेस पडल्यावर
त्यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांना या आजारातून सुखरूप बाहेर काढता
येऊ शकते. अन्यथा ठाण्यात घडलेल्या सामूहिक हत्याकांडाची पुनरावृत्ती शक्य
आहे.
स्किझोफ्रेनिया आजार म्हणजे काय?
स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार असून तो
मेंदूचा विकारही आहे. मेंदूतील ‘डोपामिन’ या रसायनाची मात्रा कमी झाल्याने
हा विकार होतो. ‘सिटोटोनिन’ या रसायनाची मात्राही या विकारात बदलते.
माणसाचे विचार, भावना व वागणूक यांच्या सुसंगतीवर अवलंबून असते. पण
स्किझोफ्रेनियात या तीन मुख्य गोष्टींमध्ये दोष निर्माण होतो. त्याच्या
वास्तवाशी संबंध तुटतो व ते स्वत: आपल्याभोवती कुंपण घालतात. जेणेकरून या
कुंपण्याच्या आत-बाहेरील कोणतीही व्यक्ती येऊ नये असे त्यांची धारणा असते.
अशाप्रकारे अन्य व्यक्तींच्या तुलनेत या व्यक्ती अत्यंत विचित्र वागतात.
आपण विचारतो एक ते उत्तर देतात दुसरेच, अशी अवस्था असते. त्यांच्या
वागण्या-बोलण्यातले तारतम्य व समतोलपणा बिघडलेला असतो. आपण या जगात
वावरताना आपले वेगळे अस्तित्व सामावून सामाजिक भान ठेवतो ते नेमके या
व्यक्तींना जमत नाही.
लक्षणे
- » वागण्यात दिसणारे बदल
स्वत:शीच हसणे व बोलणे, उगाचच हातवारे करणे, भटकत राहणे, आरोग्याबाबत बेफिकीर राहणे, अस्वच्छ राहणे, आक्रमक होणे. - » भावनिक बदल
परिस्थितीशी जुळवून न घेणे, चेह-यावर वेडेपणाचा भाव, भावनांचा अनुभव स्वत:लाच जाणवत नाही, संशयी वृत्ती. - » विचारांमधील बदल
विचारात सुसूत्रता नसणे, दोन वाक्यात वा कल्पनेत कुठलाच तर्कशुद्ध संबंध नसणे, बोलण्याचा अर्थ न समजणे.
No comments:
Post a Comment