June 14, 2016
आरती जाधव
गेल्या वर्षी स्वाईन फ्लू,
लेप्टो, डेंग्यू व मलेरिया यांच्यासारख्या साथींच्या आजाराने राज्यातील
जनतेला हैराण केले होते. यंदाच्या वर्षी पुन्हा आजारांचा प्रकोप होऊ नये
याकरिता पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. कारण, पावसाळा सुरू होण्यापूर्वी
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ९२ टक्के बर्फ
विक्रेत्यांजवळील बर्फात त्रुटी आढळून आल्या होत्या. अनेक साथीचे आजार हे
दूषित पाण्याच्या संसर्गामुळे होतात. या कारणांमुळे बर्फात दोष आढळून
आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर रुग्ण
संख्येवर आळा घालण्यासाठी बर्फ व पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करून
दोषींवर कारवाई करण्याची जबाबदारी पालिकेने आता राज्याच्या अन्न व औषध
प्रशासन (एफडीए)ला सोपवली आहे. यासंदर्भात एफडीएला रितसर पत्र लिहून कळवले
असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र, या पत्रासंदर्भात एफडीए प्रशासनच
अनभिज्ञ असल्याचे चित्र दिसत आहे. यावरून बर्फ विक्रेत्यांवर कारवाईची
जबाबदारी पालिकेने झटकून एफडीएकडे ढकलली. पण एफडीएला याची पुरेशी कल्पना
नसल्याने बर्फ विक्रेत्यांवर नक्की कोण कारवाई करणार, असा प्रश्न
नागरिकांना भेडसावू लागला आहे.
बर्फ हा अन्नपदार्थामध्ये येत असल्याने
विक्रेत्यांवर आणि कारखान्यांवर कारवाईसाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने
एफडीएला पत्र लिहून आदेशही दिला आहे. पण पालिकेने पाठवलेल्या पत्रासंदर्भात
एफडीएने काहीच माहीत नसल्याचे दाखवत हात वर केले आहेत. यावरून पालिका
प्रशासनाने एफडीएवर कारवाईची जबाबदारी ढकलत हात वर केले, असेच म्हणावे
लागेल. पण एफडीएला सुद्धा यासंदर्भात माहिती नसल्याने निकृष्ट दर्जाचे बर्फ
विकणा-या विक्रेत्यांवर कारवाई कोण करणार? अशा प्रश्न पडू लागला आहे.
याशिवाय दूषित पाण्याची ही समस्या केवळ शहरी भागाच्या तुलनेच ग्रामीण भागात
जास्त आहे. त्याच ग्रामीण भागात लोक जलस्त्रोतांच्या माध्यमातून पाणी
भरतात. पण हे पाणी अनेक वेळा अशुद्ध असते. त्यामुळे खेडय़ापाडय़ात आजारांचा
प्रसार मोठय़ा प्रमाणात होतो. दरम्यान, पाणी पिण्यास अयोग्य असून या
पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करण्यात येऊ नये, अशा पाटय़ा लावून प्रशासन
आपल्या जबाबदारीतून मुक्त होतात. पण नागरिकांचे काय? याचा विचारच कोण करत
नाही. दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे अनेक गावात पाण्याची कमतरता असल्याने
लोक नाईलाजाने दूषित स्त्रोतांवरील पाण्याचा वापर करतात. त्यामुळे, गेल्या
काही काळात गॅस्ट्रो व अतिसाराच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
यासंदर्भात राज्य सरकारने लक्ष घालून शहरासह गावखेडय़ांमध्ये शुद्ध पिण्याचे
पाणी पुरवण्यासाठी सकारात्मक पावले उचलली पाहिजेत. अन्यथा, पालिका
प्रशासनाने आजारांचा प्रसार होऊ नये म्हणून विशेष मोहीम तर राबवली. पण या
मोहिमेंतर्गत दोषी ठरलेल्यावर कारवाई करण्याची सोडून ही जबाबदारी एफडीएकडे
सोडून आपले काम पूर्ण झाल्याचे दाखवून दिले. तर एफडीए सुद्धा हे माझे काम
नसल्याचे सांगत गप्प बसून राहिले. दोन्ही प्रशासनाच्या या भूमिकेमुळे
नागरिकांच्या आरोग्यांवर परिणाम होऊ शकतो. या कारणास्तव प्रशासनावर विसंबून
राहण्यापेक्षा आता मुंबईकरांना आरोग्याशी काळजी स्वत:लाच घ्यावी लागणार
आहे, असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही.
डॉक्टर काय म्हणतात…
अशुद्ध पाण्याच्या सेवनामुळे अनेक गंभीर
आजार होऊ शकतात. त्यात कॉलरा, जुलाब, डायरिया, मुतखडा यांसारख्या आजारांचा
समावेश आहे. याशिवाय दूषित पाण्यामुळे कावीळ होण्याचे प्रमाण सर्वाधिक
असते. हे टाळण्यासाठी फिल्टरचे पाणी किंवा उकळलेले पाणी प्यावे. हात स्वच्छ
धुवावेत. भांडी नेहमी स्वच्छ ठेवावीत. नळ, विहिरीचे पाणी किंवा बोअरच्या
पाण्याच्या प्रयोगशाळेत चाचण्या करून ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, हे
पाहावे. मगच पाण्याचे सेवन करावे.
No comments:
Post a Comment